एकअविस्मरणीय प्रवास ..!!
रविवार दि. ०६ ऑगस्ट २०२३ फ्रेंडशीप डे चे औचित्य साधून मी आणि माझा मित्र विजय आणि कंपनीतील सर्व मित्र -मंडळी (दिनेश, विकास,अजय, गौरव, मनीष,अक्षय,आकाश,श्रेयस) मिळून कुठेतरी फिरायला जायचे असे ठरले होते, तर नेमके कुठे जायचे ते ठरत नव्हते,आमच्यापैकी गौरव ने सुचवले कि देवकुंड येथे एक खूप छान धबधबा आहे. लागलीच पावसाचे दिवस सुरु होते आणि धबधबा म्हंटल्यावर सर्वजण एकमुखाने तयार झाले.
आमच्यापैकी कोणी तिथे गेले नसल्या कारणाने कसे जायचे यासाठी गुगल मॅप ने सर्च करून प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यात आला . चाकण ते देवकुंड गुगल मॅप ने ९० किमी अंतर दाखविलें त्यामुळे हा प्रवास दुचाकीवरून करायचा आणि त्याप्रमाणे सकाळी लवकर निघायचे असे निश्चित करण्यात आले.
सकाळी ७:०० ला प्रवासाला सुरुवात झाली, तसं अजून लवकर निघणं गरजेचे होते, कारण पुढे काय ते कळेलच!!!
आमच्याकडे ५ दुचाकी असल्यामुळे मी व दिनेश, विजय व विकास, गौरव व श्रेयस, अजय व आकाश आणि मनीष व अक्षय अश्या जोड्या निश्चित करण्यात आल्या. चाकण-भोसरी-हिंजवाडीमार्गे-मुळशी -ताम्हिणी घाट-पाटणूस,देवकुंड अश्या मार्गाने जायचे असे ठरले होते, हिंजवडी रस्त्यावरील “श्री बापुजीबुआ मंदिर” येथे ८:00 वाजता सर्वानी एकत्र येऊन पुढील प्रवासास सुरुवात करायची होती.
आम्ही सर्व जण एकत्र येऊन चहा-नाष्टा करेपर्यंत कधी १० वाजले ते कळलेच नाही, नाष्टा वगैरे करून ताम्हिणी घाटात लवकर पोहचायचे आणि तेथे काही वेळ थांबायचे,असे ठरवून पुढील प्रवासास सुरुवात करण्यात आली.
थोड्या वेळाने दुचाकीच्या आरशातून मागे पहिले तर फक्त तिनंच दुचाकी दिसत होत्या, सर्वानी दुचाकी थांबवल्या आणि गौरव व श्रेयसची वाट बघू लागलो पण ५-१०मिनिटे झाली तरीही दोघे काय आले नाहीत, मग मी त्याला फोन केला तर कळले कि त्याची दुचाकी चालूच होत नव्हती बराच वेळ ते दोघे ती चालू करण्याचा प्रयत्न करत होता. पण दुचाकी काय चालू होत नव्हती, मग आम्ही सर्व जण परत ५-७ किमी मागे गेलो तर श्रेयश दुचाकीला धक्का देत असतानाच दृष्टीस पडला, धक्का देत तो पूर्ण घामाघूम झाला होता पण दुचाकी काय चालू होत नव्हती !!!
आता देवकुंड ला जाण्याचा प्लॅन कॅन्सल होतो कि काय असे सर्वाना वाटत होते… !!!!
सर्वांची ती घालमेल लक्ष्यात घेऊन मी पण आता बाइक चालू करण्याचा प्रयत्न सुरु केला असता माझा लक्षात आले कि दुचाकी चा बटन स्टार्ट करण्याचा स्वीचंच्या जवळ बाइक बंद करण्यासाठीचे स्वीचं बंद आहे मी स्वीचं चालू केले आणि स्टार्ट स्वीचं दाबले, लागलीच गाडी चालू झाली.
गौरवच्या प्रगल्भ बौद्धिक क्षमतेचा हा उत्तम नमुना बगुन आम्हा सर्वामध्ये एकच हशा तिथे पिकला श्रेयश मात्र गौरव-कडे मारक्या बैला सारखा बघत होता. गौरवला तो आता उचलूनच आपटतो कि काय असे वाटत होते पण त्याची बिडी काडी अन स्टील बॉडी असलेले शरीर त्याला साथ देणार नाही हे त्याला माहित होते. तो बिचारा गाडी ढकलून थकून गेला होता.उशीर झाला होता सर्वानी एकाच गौरव ला शिव्यांची लाखोली वाहिली आणि आता पुढील प्रवास सुरु झाला.
लवकरच आम्ही ताम्हिणी घाटात पोहोचलो,घाटातील पाऊस , धुके ,घाटवाटा, कोसळणारे धबधबे, कुठे पाण्याच्या काठावर असलेली टुमदार घरं सुरेखच दिसत होती, तसेच आजूबाजूची “हिरवळ” अ… ब… ब…!!!!! हे सर्व चित्र पाहून गौरव नी त्याची फोटो काढण्याची हौस भागवून घेतली, घाटातील मनमोहक सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो.
ताम्हिणी घाटातून पुढे निघाल्यावर पाऊस सुरु झाला, पावसात भिजून गरमा-गरम कांदा-बटाटाभजी, चहा यांचा आस्वाद नाही घेतला तर काय केलं आयुष्यात असे होईल…!!! हि इच्छा भागाती करत, फुल्ल कल्ला, दंगा-मस्ती, आरडा-ओरडा करत कधी पाटणूस ला पोहोचेपर्यंत ३:०० कसे वाजले ते कळलंच नाही.
पाटणूस (बेस कॅम्प) पासून देवकुंड पर्यन्त चा प्रवास पायी करायचा होता, तेथील बेस कॅम्प वरील गाईड ने पुढील प्रवासाबद्दल माहीती दिली आणि पुढील प्रवास सुरु झाला. डोंगरवाटा, कोसळणारा पाऊस, दाट झाडी वाहणारे झरे पाहून, काय ती झाडी …. काय ते डोंगर...!!! या डायलॉग ची आठवण व्हायलाच हवी !!! अल्पोपहार व सुंदर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यात एक-दीड तास केंव्हा निघून गेला समजलेच नाही. धबधब्याच्या दर्शनाची ओढ नि हुरहूर मनात सुरु होतीच.
कांही अंतरावर असतानाच धबधब्यांच्या या राजाची हाक ऐकू आली. दोन डोंगरांच्या मधून कड्यावरून खाली उडी घेतांना मोठ्या आवाजात जणू तो साऱ्यांना बोलावित होता.आम्ही कान टवकारून ऐकू लागलो व डोळे एकवटून पाहू लागलो. दृष्टीपथात येताच पाण्याचा एक प्रचंड प्रवाह खाली कोसळतांना दिसला, प्रचंड पाण्याचा झोत खाली उडी घेत होता. निसर्गाची ही आश्चर्यकारक किमयाच होती ती, घाईघाईने ते स्वर्गीय सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही जणू धावतच गेलो, धबधब्यांचे विलोभनिय दृश्य नजरेत मावत नव्हते उंच कड्यावरून नदीपात्रातील खडकावर ते कोसळणाऱ्या पाण्यामुळे उडणाऱ्या तुषारांचा अंगावर जणू वर्षावच झाला. तेथील सुरक्षा रक्षक धबधब्या कोणाला जाऊ देत नसल्यामुळे तेथूनच दिसणारे दृश्य कॅमऱ्यात टिपण्याची साऱ्यांची धडपड सुरू होती.
मूळ धबधब्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या तिन्ही धबधब्यांचे विलोभनिय दृश्य नजरेत मावत नव्हते,मग काय आम्ही सर्वांनी आमचा मोर्च्या तिकडे वळवला सुसाट उधळलेल्या घोड्याप्रमाणे पाण्याचा झोत प्रचंड वेगाने खाली कोसळत होता. घोड्याच्या टाचानी उधळलेल्या धूळीने आकाशाला गवसणी घालावी त्या प्रमाणे उधळलेल्या तुषारांची आमच्या-वर मुसळधार वृष्टीच होऊ लागली.दंगा-मस्ती, आरडा-ओरडा करत धबधब्याचा पाण्याचा मनमुराद आनंद लुटला, हे सर्व करता करता ५;०० वाजून गेले.आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
बेस कॅम्प वर पोहेचे पर्यंत जवळ जवळ ६;३० वाजून गेले होते, पार्किंग मधील फक्त काही मोजक्याच गाड्या दिसत होत्या, लवकरच अंधार पडेल म्हणून आम्ही घाई करत होतो. जोपर्यंत घाट चडून वर जात नाही तो पर्यन्त आता कोठे थांबायचे नाही,विजय बोलला. दिनेश आणि मी सर्वांच्या पुढे चालू त्या मागे सर्वानी हाकेच्या अंतरावर एक मागे एक दु-चाकी ठेवून चालायचे असे ठरले. गुगल मॅप ने पुणे सर्च केले तर आता १३० किमी दाखवत आहे असे कोणीतरी बोलले आणि आता आपण किती लांब आलोय याची कल्पना सगळ्यांना आली एका मागे एक अश्या पाच बाईक पुण्याकडे निघाल्या,लवकरात लवकर साधारण २५-३० किमी घाट वर चडून जायचे असे आम्ही ठरलवले. वळनावळणाचा घाट चढतानि देवकुंड धबडब्याचे सौंदर्य आणि प्रवासातील मजेशीर प्रसंग आठवत आम्ही साधारण ८ ते ९ किमी अंतर पार केले आणि अचानक मी माझ्या दुचाकीच्या आरशात बघितले तर काय ४ दुचाकीपैकी कोणीही मागे दिसत नाही . अरे कुठे गायब झाले..!!! म्हणतात ना आले देवजींचा मना, तिथे कोणाचे चालेना !!
मी गाडी थांबवली आणि बाकीच्या गाड्यांची वाट बगत थांबलो, दिनेश ने मागे असणाऱ्या मित्रांना मोबाइल ने संपर्क साधला, तर समजले कि अजयची गाडी बंद पडलीय,बापरे आता.. मी मागे गाडी वळवली साधारण १ किमी वर सगळे आम्हाला दिसले. आता सगळ्यांनी गाडी चालू करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले पण काय गाडी चालू होईना. अंधार पडत चालला होता गाडी काय चालू होत नव्हती, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती दिसत होती पण सगळे ती लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. आता काय करायचे कारण आम्ही नेमके घाटाच्या मध्यावर येऊन पोहोचलो होतो,आसपास कोणीतीच लोकवस्ती दिसत नव्हती आणि रस्त्यांनीं पण कोणीच नव्हते. बराच वेळ झाला आम्ही गाडी चालू करण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होतो अंधार आता पडला होता आणि आम्हाला कळून चुकले होते कि गाडी काय आता चालू होत नाही, मदत कोणाची घ्याची तर आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. थांबून चालणार नाही काहीतरी करावे लागणार,पण काय कळत नव्हते इतक्यात विकास बोलला आपण गाडीला दोरी बांधून ओढत नेऊ, मी म्हंटलं दोरी कुठेय भाऊ आपल्याकडे, पण म्हणतात ना देवाची करणी नि नारळात पाणी. माझाकडे आहे दोरी,विकास बोलला.चला काहीतरी मार्ग सापडला पण मार्ग सोपा नव्हता. एका गाडीने दुसरी गाडी ओढत न्यायची ते पण १०-१२ किमी घेता चढत. मी म्हटले नको खुप रिस्क आहे कोणी पडले तर तसा झपकन विकास पुढे आला आणि म्हणाला सर मी नेतो गावाकडे मला बांधावरून गाडी चालवण्यात मी लहानाचा मोठा झालोय, घाट बिट सब झूट हे सर !!! विकास चा कॉन्फिडन्स मला कमी नव्हता करायचा मी शांत राहिलो एव्हाना विकास ने दोरी दोनी गाडयांना बांधली आणि अजय त्याचा गाडीवर मागे आणि विकास पुढे … आम्ही तीन दुचाकी घेऊन मागे असा प्रवास चालू झाला,आम्ही हळू हळू घेत चढत होतो घाटाच्या प्रत्येक वळणावर दोनी गाड्या हेलकावे घेत होत्या कधीही काही होऊ शकते, काय कराव ते कळत नव्हते तेवढ्यात एक बोलेरो पिक-अप मला दिसली नंबर बघितला एम एच १६, अरे वा नगर पासिंग गाडी. मनाशी म्हंटले आता काम झालं गाडीजवळ गेलो ड्रायव्हरला नमस्कार केला ओळख काढली तो हि गावाकडचाच निघाला,मनात म्हंटल देव पावला झालेला प्रसंग सांगितला, मदत मागितली म्हणाला मी दोघाना गाडीत घेतो पण मी सुचविले कि बंद पडलेली गाडी घ्या ना तुमच्या गाडीत. माफ करा पण गाडीत जागा नाहीय आंब्याची रोपे आहेत त्याने सौम्य आवाजात उत्तर दिले. आता काय करणार,तोवर विकास आणि अजय बरेच पुढे गेलेत होते. वळणावळणाचा रस्ता, गर्द अंधार, रस्त्यांचा कडेला वाहणाऱ्या पाण्याचा आणि रात किड्यांचा आवाज , मध्येच सळसळणारा एखादा साप, रस्त्यावर फक्त ५ दुचाकी आणि आम्ही १० जण, ना आगे.. ना पीछे, ना बंदा ना बंदा कि जात !!!रात्रीचे ९ वाजले होते साधारण एक तास झाला आम्ही घाट चढत होतो पण घाट काय चडून संपत नव्हता तसेच आता माझी गाडीही घाट चडत नव्हती कारण आता गाडीवर मी ,दिनेश आणि श्रेयश असे तिघे होतो. गाडीचा आवाज बदल -लेला होता गाडी कधी बंद पडेल असे सांगता येत नव्हते,गाडी बंद पडली तर काय होणार या चिंतेने मला काही सुचत नव्हते त्यातच ३ ऑगस्ट ला हरिशचंद्र गड येथे झालेल्या ताजा घटनेची आठवण झाली आणि भीतीनं आवाज निघेना-सा झाला, आता काय आपले पण असे होतय कि काय या विचाराने मनात धस्स झाले,आम्ही कसेबसे घाटाच्या अगदी टोकावर पोहोचलो होतो.जशी बाजी प्रभू देशपांडे यांनी खिंड लढवून ती पावन केली,त्याचप्रमाणे विकास आणि अजय यांनी घाट चढवून आज पावन केला होता.त्यांचा या साहसाला सलाम.
घाट चढून झाला पण जितका चंढणे अवघड होता तितका उतरणे अवघड, नाही नाही अश्यक्यच होता !!!आता अश्या परिस्थितीत बंद गाडी घेऊन घाट उतरायचे नाही असे आम्ही ठरवले,आता काय करायचे तर तितक्यात थोड्याशा अंतरावर डोंगरावर्ती बल्ब चा प्रकाश दिसला, आम्ही तिथे जाऊन मदत मागायचे ठरवले दिनेश आणि मी पुढें गेलो, एक छोटे हॉटेल होते ते पण तो बंद करण्याच्या तयारीत होता. मी त्याच्याकडे गेलो आणि सगळी आप बीती सांगितले, हॉटेलवाला उच्चारला अंधार पडायला आला होता तर तुम्ही तिथेच थांबायला हवे होते रात्रीला या रस्त्याला कुणीही नसते,आम्हला कल्पना नव्हती मी म्हणालो. तोपर्यंत अजय आणि बाकीचे हॉटेल पर्यंत पोहोचले… नंतर हॉटेल मधील एकाने गाडी चालूं करायचे प्रयत्न केले पण आमचं नशीब आज चांगलेच उजळले होते,त्याचाशी च- र्चा केल्यावर त्याने मदतीस होकार दिला मी नेतो बंद पडलेली गाडी सुसगावापर्यंत, ३५००रू होतील नाही हो करता करता १५०० रू ला व्यवहार ठरला आणि अजयची दुचाकी त्या गाडीत चढवली. मनातले देवाने ऐकलं आपलं आणि पुढील प्रवास सुरु केला. आता वाटलं फक्त घाट उतरायचा कि झालं,पण नाही,आता हवा खुप थंडगार लागायला लागली, त्यातच अचानक खुप धुकं १० फुटापर्यंत पण दिसायचं बंद झालं एका अजब परिस्थितीत आम्ही अडकलो होतो पुढेही जात येत नव्हते नि मागेही रात्रीचे साधारण १० वाजून गेलेले अजून ७० किमी जायचे होते,रस्ता दिसत नव्हता,थंडीने सर्व गारठलेले, पोटात भूक,आजूबाजूला कोणी नाही,एका मागे एक बाइक हळू हळू आम्ही चालत होतो,उंच डोंगरावरील धुके जणू आम्ही स्वर्गातच पोहोचला कि काय असे अनुभव करून देत होते.पण स्वर्गात पोह- चायला खुप पुण्य लागते तेवढे तरी कोणीच अजून केले नव्हते. हेच काय ते आमचे भाग्य ..!!! आताच इसरो ने सोडलेले “चंद्रयान ३” भरकटून आम्हाला भेटावं आणि त्यांनी आमची मदत करावी किंवा देवकुंडला सापडलेले एक गोल गुळगुळीत दगड आठवण म्हणून घेतलेला निदान तो तरी बॅगेतुन काढावा आणि त्याला घांसून बगाण्यास दिनेश ला सांगावे आणि त्यातून काहीतरी चमत्कार घडावा आणि आम्हाला मदत मिळावी, असे अनेक विचार मनात येत होते. मन समुद्रातल्या भोवऱ्यासारखे आहे ते माणसाला दूर नेऊन बुडवते. एक वेळ समुद्राला बांध घालणे सोपे असेल. पर्वत उपटने सोपेअसेल. पण मनाला आवर घालणे महाकठीण कर्म आहे…!!!
मनात भीतीचे डोंब खळखळत होते एकामागून एक वाईट विचार मनात येत होते.. या सर्व संकटात फक्त एकच चांगली गोष्ट होती ती म्हंजे पाऊस बंद होता आणि रास्ताला अजिबात खड्डे पडलेले नव्हते जणू आम्ही सोडून इकडे कोणीच गेलं नसावे कारण आम्हाला एक दोन बस सोडल्या तर कोणत्याही प्रकारच्या गाड्या या २ ते ३ तासाच्या प्रवासात भेटल्या नाही.
घाटात घोंगावत अंगावर येणाऱ्या वाऱ्याचा सुन्न करणारा एक खुनशी आवाज इतकेच काय ते जाणवत होते, त्यातच ह- रिश्चंद्र गडावरची झालेली घटना एकसारखी आठवत होती अश्या परिस्तिथीत आम्ही साधारण घाट अर्ध्या पर्यंत उतरत आलो आणि धुके कमी होऊ लागले तसा थोडा जिवात जीव आला अशातच अजून एक संकट आमचा पुढे उभे राहिले ते म्हणजे गौरव च्या बाईक चे पेट्रोल संपत आले होते जेम तेंम ५-६ किमी गाडी जाईल इतकेच पेट्रोल शिल्लक आहे असे तो म्हणाला.आता तर माझा धीर खचत चालला होता पण थांबून चालत नव्हते, दूर दूर पर्यंत पेट्रोल पंप नव्हता वेळ पडली तर दुसऱ्या बाइक मधून पेट्रोल काडू आणि टाकू, पण आता काहीही झाले तर थांबायचे नाही. लागलीच अजून एक हॉटेल समोर आले तेथे विचारणा केल्यावर कळले कि पुढे १० किमी अंतरावर एक हॉटेल आहे त्याचाकडे पेट्रोल मिळेल. तसा त्या हॉटेल चा शोध चालू झाला आणि लवकरच संपला, एव्हाना मनातल्या मनात गौरवला आणि मी इकडे का आलो म्हणून स्वतःला शिव्यां देत होतो, सकाळी ज्यांनी उशीर केला त्यांची आणि गौरव ची येथेच्छ धुलाई करावी किंवा आपल तरी डोके कोठंतरी आपटावं असं वाटत होते. .पण त्यासाठी थांबावे लागणार होते, तेवढी हिंमत आता आमच्यात नव्हती. प्रवास चालू होता, घाटआणि संकटे काय संपत संपत नव्हते, त्यातच आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. सकाळी उशीर झाला होता त्यामुळे जेवण करता आले नाही, सकाळी १ मिसळपाव, चहा, भजी आणि देवकुंड वरून परतताना अक्षयनी आणलेले शेंगदाणे एवढाच काय ते अन्न पोटात गेले होते म्हणतात ना…. वेळेला केले आणि वनवासात सीताफळे!! त्याप्रमाणे शेंगदाणे नि काम केलं होत यासाठी अक्षयला मला शक्क्य झाले तर नक्क्कीच एक भारत-रत्त्न पुरस्कार दिला पाहिजे असे मला वाटत होते पण त्यासाठी अगोदर या घाटातून खाली उतरणे गरजेचे होते.आपण कोठे चाललो आहोत रास्ता चुकलो तर नाही अशा अनेक शंका मनात वादळ निर्माण करत होत्या. अशातच तम्हिनी घाटात सक्काळी मजा केली तो पॉईंट आला होता सकाळी उभे राहा-यला जागा नव्हती आणि तेथे आता तर स्म्शानशांतता होती. आपण कुठेतरी लांब जंगलात आहे असे वाटत होत या नंतर पुढील रस्ता ओळखीचा असल्याने आता कुठेतरी जेवण करायचे असे ठरले. लवकरच लाल- मिर्च हॉटेलला आम्ही पोहोचलो. रात्रीचे ११:४५झाले होते तो हॉटेल बंद करण्याची तयारी चालू होती. आमचे सुकलेले चेहरे बगून तरी त्याने जेवण द्यावेअसा मनातल्या मनात विचार येऊन गेला, भीतीनं आणि थंडीने पोटात आग पडली होती लाल -मिर्च ने ती भागवली आणि पुढील प्रवास सुरु झाला, जसजशी थोडेफार लोकवस्ती, घरे दिसत होती तसतशी आमची भीती कमी कमी होत होती.
लवकरच आम्ही मुळशीत पोहोचलो आणि एकच मुळशी पॅटर्न पिक्चर मधील डायलॉग्ज आठवले तुम्ही आम्हाला घोडे लावले ना.!! आम्ही तुम्हाला बैल लावू .. बैल आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो, नांगरासकट !!! अगदी आमच्या प्रवासातील संकटांसारखा, तसेच त्यासाठी मसल पाहिजे,भाऊ मसल…त्यासाठी मसल नाही डेरिंग पाहिजे डेरिंग, अगदी आमच्यासारखी !!! आणि सगळ्यात महत्वाचाच तर राहिलाच, ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल नं, त्या दिवशी आपला खेळ खल्लास..!!! यमदेव जरी रेड्यावर बसून आला कि नाही तरी आपण अशा थाटात उभे रहायचं कि, आपले अवतार बगुन त्या रेड्याची पण फाटली पाहिजे….कशी … टारर्रर्रकन .. टारर्रर्रकन नाही कशी … तर अशी टाररररर्रर्रर्रर्र र्रर्रकन !!!! अगदी आमच्यासारखीं…!!! आमचा अगदी मुळशी पॅटर्न २ झालेला होता …. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला लाजवेल असे एकामागून एक सिन चालले होते.. लवकरच आम्ही “श्री बापूजी बुआ” मंदिर येथे आलो, बाइकवरूनचं देवाला नमस्स्कर केला, सकाळी देवाचे दर्शन घेतले होते त्याचेच काय ते पुण्य !! येणाऱ्या संकटाना सामोरे जायचे धैर्य दिल्याबदल देवाचे आभार मानले.सकाळी सर्वानी जेथून प्रवासास सुरुवात केली तेथे आलो होतो. हिंजवडीत पोहोचल्यावर जो तो आपापल्या घराकडे निघाला. घरी पोहोचलो रात्रीचे १;३० वाजले होते. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” या प्रसिद्द संस्कृत शोल्काची आठवण झाली.
आपलं घर ते घर असतं … म्हणतात ना … सुखं म्हणजे नेमकं काय असतं…!!!
सदर प्रस्तावना वाचुन येणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया नक्कीच मला ” देवकुंड ” वर आणखी लिहिण्याची ऊर्जा देतील हि अपेक्षा ..धन्यवाद …!!!
मनोगत:-संतोष चौधरी.